१५ ऑगस्टच्या मंगलदिनी ८० व्या वर्षात पदार्पण
शब्दांकन - शुभम कोदे, (विभागीय उपसंपादक, सातारा)
स्वातंत्र्यदिन हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाने स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला आणि याच दिवशी वाई तालुक्याच्या पश्चिमेकडील आसगाव या छोट्याशा गावात एका कर्तृत्ववान बालकाचा जन्म झाला - श्री. दिनकर महादेव शिंदे अर्थात सर्वांचे लाडके 'बापूसाहेब शिंदे'. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कालखंडानंतर आज वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण करताना बापूसाहेबांच्या जीवनपटाकडे पाहिले, तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे माणसांशी जपलेली घट्ट नाळ, समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र धग आणि संकटांना सामोरे जाण्याचे निर्भीड धाडस!
बापूसाहेबांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवातच मुळात 'युवक संघटन' आणि 'समाजकारणातून' झाली. आसगावच्या मातीत रुजलेल्या या नेतृत्वाने तरुणांना विधायक दिशा देण्यासाठी 'नेताजी सुभाषचंद्र युवक मंडळा'ची स्थापना केली. गावची यात्रा असो, गणेशोत्सव असो वा कबड्डीचे मैदान; तरुणांना शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकीचे धडे देत त्यांनी गावात एक नवीन चैतन्य निर्माण केले. समाजकारणासोबतच त्यांना कला-संस्कृतीची आणि विशेषतः रंगभूमीची मोठी आवड राहिली. नाटकात प्रत्यक्ष अभिनय करून त्यांनी आपली कला जपली. व्यवसायात स्वतःच्या कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवत असतानाही त्यांनी समाजकार्याला कधीच दुय्यम स्थान दिले नाही.
शिक्षणाची मशाल आणि मंदिरांचा जीर्णोद्धार
बापूसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे 'दातृत्व'. समाजाने आपल्याला जे दिले, त्याची परतफेड केली पाहिजे ही त्यांची भावना कायम राहिली. वाई तालुक्यातील अनेक ग्रामदेवतांच्या मंदिरांच्या उभारणीत व जीर्णोद्धारात त्यांनी सढळ हस्ते मदत केली. परंतु, धार्मिक कार्यापेक्षाही मोठे कार्य त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केले. ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या हातात शिक्षणाची मशाल आली पाहिजे, या ध्येयाने त्यांनी चिखली येथील 'बापूसाहेब शिंदे हायस्कूल' च्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले. आज या ज्ञानमंदिरातून शिकून बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत; हेच बापूसाहेबांच्या दूरदृष्टीचे मोठे फलित आहे.
राजकारण नव्हे, जनसेवा!
बापूसाहेबांचा राजकारणातील प्रवेश हा सत्तेच्या लालसेने झालेला नाही, तर त्यांनी केलेल्या प्रदीर्घ समाजकार्याचा तो एक नैसर्गिक परिपाक होता. त्यांच्या पाठीशी उभा असलेला अथांग जनाधार पाहूनच त्यांच्या पत्नी सौ. राधाताई शिंदे यांना वाई पंचायत समितीचे सभापतीपद तसेच सातारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जन्मभूमी चिखलीचे सरपंच ते विकास सेवा सोसायटीचे चेअरमन असा प्रवास करत त्यांनी गावपातळीवर विकासाची नवी गंगा आणली.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद पाटील (आबा) यांनी बापूसाहेबांचा हाच जनाधार ओळखत राजकीय मतभेद बाजूला ठेवून यशवंत नगर गटातून त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. वयाच्या ८० व्या वर्षी प्रदीर्घ जनसंपर्काच्या जोरावर निवडणूक जिंकून जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान मिळवणे, हा केवळ बापूसाहेबांचा वैयक्तिक विजय नसून वाई तालुक्यातील जनतेने त्यांच्या प्रामाणिक जनसेवेवर मारलेली ही पक्की मोहोर आहे!
'नेता' ते 'लोकनेता'
स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा, प्रसंगी अन्यायाविरुद्ध आक्रमक होणारी वृत्ती आणि नदीच्या पुराच्या पाण्यातही पोहण्याचे धाडस—ही बापूसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये आहेत. जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणे, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे या गुणांमुळेच ते सामान्य जनतेच्या मनात 'लोकनेता' म्हणून स्थानापन्न झाले आहेत.
ज्यांच्या जीवनप्रवासाचा केंद्रबिंदू 'मी' नसून 'आपण' असतो, अशा लोकनेत्याचा ८० वा वाढदिवस साजरा होणे हा संपूर्ण वाई तालुक्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे. ८० व्या वाढदिवसानिमित्त आदरणीय बापूसाहेब शिंदे यांना 'शिवशाही न्यूज' परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि जनसेवेची अशीच अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























