खासदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, अमरावती प्रतिनिधी
अमरावती लोकसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील रावळगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांनी तत्काळ दखल घेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन करण्यात आलेल्या या पाहणीत अनेक शेतांमध्ये बियाणे अत्यल्प प्रमाणात उगवले असल्याचे तसेच काही ठिकाणी बियाणे पूर्णपणे न उगवल्याचे निदर्शनास आले.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची व्यथा खासदार बळवंत वानखडे यांच्यासमोर मांडली. अनेक शेतांमध्ये केवळ 10 ते 20 टक्केच उगवण झाली असून काही ठिकाणी बियाणे अजिबात उगवले नसल्याचे आढळून आले. जे पीक उगवले आहे त्याचाही दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांनी बूस्टर, ओसवाल तसेच इतर काही कंपन्यांच्या बियाणांबाबत गंभीर तक्रारी केल्या. या निकृष्ट व संशयास्पद बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यातून मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित बियाणा कंपन्या व विक्रेत्यांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच दोषी आढळणाऱ्या बोगस बियाणे विक्रेता कंपन्या व संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, माजी पंचायत समिती उपसभापती श्रीधरभाऊ काळे, चेतन जवंजाळ, सुनील पवार, स्वप्निल राऊत, सुभाष खांडेकर, गोलू अतकरे, राजेंद्र राऊत, प्रकाश राऊत, हर्षल जवंजाळ, प्रशांत भडांगे, जुबेर भाई यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



