नित्कृष्ट दर्जाच्या कामाचा आणखी एक बळी; सुदैवाने जीवितहानी टळली
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई–सुरूर–पोलादपूर मार्गावरील रस्तेबांधणीतील भ्रष्टाचाराचा आणि निकृष्ट कामाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. वाई येथील भद्रेश्वर पूल आणि किरण हॉटेलजवळ मुख्य रस्ता अचानक खचल्याने एक अवजड टेम्पो त्यात रुतून बसला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली, तरी या निमित्ताने नागरिकांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे. "प्रशासनाला आणि ठेकेदाराला अजून किती बळी हवेत?" असा संतप्त सवाल आता वाईकर विचारत आहेत.
या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे रोज 'जीव मुठीत धरून' चालण्यासारखे झाले आहे. रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे, अर्धवट सोडलेले आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या रक्ताळलेल्या रस्त्याला जबाबदार कोण? असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ठेकेदाराने शासनाने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. मुदतवाढ मिळवूनही अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ठेकेदाराचा मनमानी कारभार उघड्या डोळ्यांनी सुरू असताना, संबंधित यंत्रणा आणि जबाबदार अधिकारी मात्र सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सततची वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि वाहतूकदारांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक व्यावसायिक कर्जाच्या खाईत ढकलले गेले असून काहींचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
रस्त्याच्या कामात पहिल्या दिवसापासून त्रुटी दिसत असतानाही संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई का झाली नाही? वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही प्रशासन ढिम्म का आहे? सामान्य जनतेच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या रस्त्यांचा हा खेळखंडोबा आणखी किती दिवस सहन करायचा? असा थेट सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असून "सार्वजनिक निधीची अशी लूट आणि जनतेच्या जिवाशी होणारा खेळ आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल," असा जाहीर इशारा वाईतील जागरूक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



