भरधाव ट्रक दुकानात घुसला, एक ठार तर एक जण जखमी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई वाई-पाचवड मार्गावरील बावधन ओढा येथील पुलाशेजारी गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविण्यात येणारा टाटा कंपनीचा एपी 29 टीसी 0972 क्रमांकाचा 1613 ट्रक अचानक नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेने जाऊन "किराणा अँड स्नॅक्स सेंटर" या दुकानात घुसल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात बाळासाहेब लक्ष्मण पिसाळ (वय 72) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बंडा मोहिते हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दुकानासह परिसरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुकानासमोर उभी असलेली एमएच 11 सीएफ 0767 क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी, जी विश्वजीत अशोक शिंदे यांच्या मालकीची असून अजित आत्माराम शिंदे (रा. बावधन, ता. वाई) यांच्या दुकानासमोर उभी होती, तीही या अपघातात गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक नितीन कांबळे (रा. व्याहळी) हा वाईहून पाचवडकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण गमावून बसला. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार चालकाने मद्यप्राशन केले असल्यानेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पीएसआय अमित सुर्वे, रुपेश जाधव (ट्रॅफिक हवालदार) तसेच गोरखनाथ दाभाडे विशाल येवले राम कोळी धीरज कुमार भोसले राहुल भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी 112 क्रमांकावर संपर्क साधण्यात आला; मात्र वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अखेर पोलिसांनी मानवतेचे दर्शन घडवत जखमी चालकाला स्वतःच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर वरद आयसीयू हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून डॉ. शैलेंद्र धेंडे यांनी स्वतः ॲम्बुलन्स चालवून मृत व्यक्ती व जखमींना पुढील उपचार व शवविच्छेदनासाठी वाई येथे हलविण्यात आले. या भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच आपत्कालीन सेवांची अपुरी उपलब्धता हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाई पाचवड रस्त्याला बावधन ग्रामपंचायतीने बावधन गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या त्या रस्त्याला गतिरोधक टाका म्हणून वारंवार मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे अनेक वेळा मोठमोठे अपघात घडले आहेत याशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेती असल्याकारणाने लोकांची ये जा रस्ता ओलांडणे रस्त्याच्या शेजारी वस्ती असल्याकारणाने रहदारी मोठ्या प्रमाणात असते तरी ताबडतोब या रस्त्याला गतिरोधक टाकावे व होणारे अपघात टाळावे अशी विनंती युवा नेते विजयसिंह शशिकांत पिसाळ यांनी केली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



