विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बसला आहे. डोंगरालगत असलेल्या शाळेच्या पाठीमागील उतार मोठ्या प्रमाणात खचल्याने मातीचा भराव, दगड-गोटे थेट शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या दरडीमुळे शाळेतील मुला-मुलींच्या शौचालयाचे तसेच किचनशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास डोंगराचा अधिक भाग खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शाळेच्या पाठीमागे तातडीने मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात यावी, खचलेली माती व दगड-गोटे त्वरित हटवावेत, तसेच नुकसानग्रस्त शौचालय व किचनशेडची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या आपत्कालीन परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी आणि भविष्यातील संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी पिराचीवाडी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर यांनी केली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



