'स्वर्गातून येऊन कर्ज घेतलं का?' – सदाभाऊ खोतांचा सरकारला सवाल
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराने विधान परिषदेत मोठी खळबळ उडवली आहे. मृत व्यक्तींच्या नावावर कर्ज मंजूर करून बनावट कागदपत्रे व बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे लाखो रुपयांची रक्कम उचलल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संबंधित एआयआर (Annual Information Return) आणि डीडीआर (District Deputy Registrar) यांना तत्काळ निलंबित करण्याची घोषणा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली.
याचबरोबर संपूर्ण प्रकरणाची सात दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी विधान परिषदेत दिली.
सभागृहात लक्षवेधी सूचना मांडताना आमदार सदाभाऊ खोत यांनी गंभीर आरोपांची मालिका मांडली. महाबळेश्वरवाडीसह इतर काही सहकारी संस्थांमध्ये मृत व्यक्तींच्या नावावर कर्ज मंजूर करण्यात आले, बनावट स्वाक्षऱ्या करून कर्जाची रक्कम काढण्यात आली, तसेच सोसायटीच्या तत्कालीन अध्यक्षांनी स्वतःच्या मृत आईच्या नावावरही कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
सभागृहात सरकारला घेरताना सदाभाऊ खोत यांनी उपरोधिक शब्दांत सवाल केला, "स्वर्गातून येऊन कर्ज घेतलं आणि परत गेले का?" त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.
उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्राथमिक चौकशीत मृत व्यक्तींच्या नावावर कर्ज मंजूर करणे आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचे समोर आल्याचे मान्य केले. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून, दोषींविरुद्ध लवकरच फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



