पावसाचे पाणी साठणाऱ्या ठिकाणी तातडीने मुरमीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीमध्ये विविध पालखी सोहळ्यांसोबत लाखो वारकरी आणि मोठ्या प्रमाणात दिंड्या दाखल होत आहेत. या दिंडीसोबत येणाऱ्या भाविकांची मुक्कामाची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून '६५ एकर भक्ती सागर' परिसर सज्ज करण्यात आला आहे. या संपूर्ण परिसराची आणि तेथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी आज जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केली.
वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून मूलभूत सुविधा
भक्ती सागर (६५ एकर) या मुख्य मुक्काम स्थळावर प्रशासनामार्फत दिंड्यांसाठी एकूण ६६८ प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून खालील प्रमुख सुविधा पुरवण्यात येत आहेत:
स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी
पुरेशा प्रमाणात सुलभ शौचालय व्यवस्था
चोवीस तास आरोग्य व वैद्यकीय सुविधा
अखंडित विद्युत व्यवस्था आणि प्रकाश योजना
आपत्कालीन परिस्थितीसाठी 'आपत्ती व्यवस्थापन कक्ष'
२४ तास स्वच्छता मोहीम
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश
सध्या पावसाचे दिवस असल्याने भक्ती सागर परिसरातील सखल भागात पाणी साठण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठू शकते, अशा जागांवर तातडीने मुरमीकरण करून पाण्याचा निचरा करावा, जेणेकरून मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांना आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पाहणी दरम्यान दिले.
प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर पूर्ण केल्या जात आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



