नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचे उत्साहात स्वागत - जिल्हा प्रशासनातर्फे निरोप-स्वागत समारंभ संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
तात्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाल्यानंतर, तब्बल दोन महिन्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना अत्यंत भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. याच सोहळ्यात सोलापूरचे नवे 'स्माईली' जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचेही जंगी स्वागत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) सभागृहात हा निरोप आणि स्वागत समारंभ पार पडला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या कौटुंबिक सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निरहाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, सीमा होळकर, विजया पारंगकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, अंजली मरोड, चंद्रकांत कासेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार नीलेश पाटील, सैफन नदाफ, कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे, उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, महसूल संघटनेचे शंतनु जाधव, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के आणि धाराशिवचे जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि सभागृहात हशा पिकला!
यावेळी बोलताना कुमार आशीर्वाद काहीसे भावनिक झाले होते. आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना ते म्हणाले,
"गडचिरोलीनंतर माझी लातूरला जाण्याची इच्छा होती, पण मला सोलापूर मिळाले. तेव्हा लोकांनी मला सांगितले की गडचिरोलीपेक्षा सोलापुरात जास्त 'नक्षल' (प्रशासकीय अडथळे/राजकारण) आहे!" त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
सहकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
सीना नदीच्या पुराच्या वेळची आठवण करून देत कुमार आशीर्वाद म्हणाले की, "कोणत्याही कामाचे यश हे सहयोगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर अवलंबून असते. मी फक्त प्रमुख होतो, पण खरी मेहनत माझ्या टीमने केली."
नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि सीईओ कुशल जैन यांना सल्ला देताना ते म्हणाले, "प्रशासनात नेहमी समन्वय (बॅलन्स) ठेवा आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या." शेवटी, "सोलापूरचा एक माणूस आता नागपुरात बसला आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या कामांचा पाठपुरावा मी तिथूनही करेन," असा शब्द देत त्यांनी आपले शिपाई, क्लर्क, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि बंगल्यावरील कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
तुम्हीच नेहमी आमचे जिल्हाधिकारी असणार - कार्तिकेयन एस
नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आपल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, "कोल्हापूरच्या लोकांनी मला सोलापूर हा अतिशय 'खतरनाक' आणि संवेदनशील जिल्हा असल्याचे सांगितले होते. पण मला इथे कुमार आशीर्वाद यांच्या रूपाने मोठा भाऊ मिळाला आहे. सर, तुम्हीच नेहमी आमचे जिल्हाधिकारी असणार! तुम्ही सुरू केलेली सर्व विकासकामे मी पूर्णत्वास नेईन."
झेडपीचे सीईओ कुशल जैन यांनीही कुमार आशीर्वाद यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगत, आगामी काळातही त्यांचे मार्गदर्शन मिळत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
प्रचंड स्मरणशक्ती अन् मराठीवर पकड!
कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी कुमार आशीर्वाद यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. आशीर्वाद सरांची प्रचंड स्मरणशक्ती आणि मराठी भाषेवरील उत्तम पकड वाखाणण्याजोगी होती, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रशासकीय शिस्तीसोबतच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घेतली, म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात एकही कर्मचारी आंदोलन झाले नाही. 'कुटुंबप्रमुख कसा असावा, याचे ते उत्तम उदाहरण होते,' अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



