आदिशक्ती महासंघा'चा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे आज कराडमधील जनतेला सार्वजनिक आणि शासकीय स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे नाहक मनस्ताप आणि नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. "स्वच्छतागृह ही काही चैनीची गोष्ट नसून, तो नागरिकांचा सन्मान, आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित मूलभूत अधिकार आहे. मात्र येथील दुरवस्था पाहिली, तर सुजाण नागरिकांची मान लाजेने खाली जाते," असा संतप्त सवाल आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ-पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. प्रशासनाने यात तात्काळ सुधारणा न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अश्विनीताई वेताळ-पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात कराड शहरातील कराड मध्यवर्ती बस स्थानक, मुख्य बाजारपेठ व टाऊन हॉल परिसर, पंचायत समिती कार्यालय, ऐतिहासिक प्रीतीसंगम घाट, विद्यानगर कॉलेज परिसर, तहसील कार्यालय, कराड तालुका व शहर पोलीस स्टेशन, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय या प्रमुख ८ ठिकाणच्या भयानक दुरवस्थेकडे प्रशासनाचे जाहीर लक्ष वेधले आहे.
"सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ ठेवणे हे नागरिकांचे कर्तव्य असले, तरी नियमित साफसफाई, फिनेल-जंतुनाशक फवारणी आणि पाण्याची चोख व्यवस्था ठेवणे ही मूळ कायदेशीर जबाबदारी संबंधित प्रशासन आणि यंत्रणेचीच आहे. भारतीय संविधान अंतर्गत स्वच्छ पर्यावरण आणि आरोग्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. जनतेला या सुविधेपासून वंचित ठेवणे हा कायद्याचा अवमान आहे," असे अश्विनीताई वेताळ-पाटील (आदिशक्ती महासंघ) यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले.
प्रशासनाने कराडमधील सर्व सार्वजनिक व शासकीय स्वच्छतागृहांची तात्काळ पाहणी करावी. तसेच नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभालीची प्रभावी व कायमस्वरूपी व्यवस्था तात्काळ अमलात आणली पाहिजे. जर प्रशासनाने यामध्ये तातडीने पावले उचलली नाहीत, तर आदिशक्ती महासंघाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पत्रका शेवटी देण्यात आला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



