सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुक
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीत साताऱ्यात निष्ठावंतांना डावलून दलबदलूना भाजपाने संधी दिल्याने पक्षांतर्गत सध्या उलट सुलट चर्चा रंगली आहे. पक्षासाठी दिवस रात्र परिश्रम करणारे व निष्ठेने पक्षाचा झेंडा हाती घेऊन कार्य करणाऱ्या नेत्यांना नारळ व दलबदलूना पायघड्या घातल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटला आहे. दलबदलू तुपाशी व निष्ठावंत उपाशी अशी गोची निष्ठावंत नेत्यांची झाली आहे. मुळात सातारा जिल्हा हा यशवंत विचारांचा व एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा गड मानला जात होता. परंतु अनेक नेत्यांनी सत्तेच्या मोहापाई पक्षांतर केले त्यामुळे या जिल्ह्यात भाजपला आपले पाय रोवता आले. विशेषता सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट पाहून अनेकांनी पक्षांतर केले. पक्षांतर केलेले नेते मंडळीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरले आहेत. पक्षांतर केलेल्या नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी अल्पावधीतच भाजप पक्षात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. आणि पाहता पाहता निष्ठेने व सेवाभावाने काम करणाऱ्या भाजप नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ लागला. सत्तेच्या चाव्या या पक्षांतर केलेल्या नेतेमंडळी च्या हाती आल्याने त्यांनी त्यांच्या सोयीच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेतले. आज निष्ठावंतांना पदासाठी झगडावे लागत आहे.
सध्या महायुती मधून उमेदवारी प्राप्त झालेले उमेदवार धैर्यशील कदम हे मूळचे काँग्रेस विचारधारेचे त्यांनी सन २०१४ ची विधानसभेची निवडणूक ही काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी नंतर शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन राजकारण केले. परंतु तिथेही त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी भाजपची वाट धरली. तिथे त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी लाभली. या संधीचा फायदा घेत त्यांनी संपूर्ण जिल्हाभर आपले नेटवर्क उभे केले. अर्थात त्यांना यासाठी माण च्या लोकप्रतिनिधीं जयकुमार गोरे यांची मोलाची साथ मिळाली. मुळचे काँग्रेस विचारधारेचे असलेले मंत्री जयकुमार गोरे हे कालांतराने ग्रामविकास मंत्री झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले बळ हे जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रगतीला पूरक ठरले. तेच जयकुमार गोरे आज जिल्ह्याच्या राजकारणातील सर्व सूत्रे फिरवीत आहेत. या सगळ्या घडामोडीत मात्र निष्ठावंतांकडे पहायला पक्षश्रेष्ठींना वेळ नाही ही दुर्दैवी बाब आहे. भाजपाच्या वाढीसाठी ज्या निष्ठावंतांनी प्रामाणिकपणे अहोरात्र कष्ट केले त्या नेत्यांकडे मात्र सत्तेची पदे देताना दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण जिल्ह्यात हिंदुत्वाचे विचारधारा रुजविणारे कराडचे विक्रम पावसकर,सातारचे अमित कुलकर्णी यासारखे अनेक दिग्गजांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली अशा नेतृत्वाला संधी न देता दलबदलूना संधी मिळाली आहे. हे खरे तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर एक प्रकारे अन्यायच झाल्याचे दिसून येत आहे.
अर्थात निष्ठावंतांवर झालेला अन्यायाचा कळत नकळत परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत उमटणार हे निश्चित. त्यात महाविकास आघाडीचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीत तगडे आव्हान उभे केले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा वचपा यानिमित्ताने काढण्याची सुवर्णसंधी महाविकास आघाडीला चालून आली आहे. त्यात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई व मंत्री मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सत्तेच्या समीकरणात महायुतीतील नेत्याने जिल्हा परिषदेच्या निवडीच्या वेळी केलेल्या दगाबाजीची पडसाद या निवडणुकीत उमटणार याचे संकेत आता प्राप्त होऊ लागले आहेत. एकीकडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे आव्हान धैर्यशील कदम यांच्यापुढे उभे राहिले आहे. अर्थात या सगळ्या घडामोडीत सातारच्या राजे गटातर्फे नाव पुढे करण्यात आलेले माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांचा पत्ता कट केल्याचा परिणामही या निवडणुकीत दिसून येणार आहे. एकूणच राजकीय समीकरणे पाहता सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही रंगतदार होणार हे तितकेच खरे आहे अर्थात दलबदलूना पक्षश्रेष्ठींनी दिलेली संधी हे कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरवणार आहे.
श्रीरंग काटेकर सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



