१ जुलै २०२६ रोजी मुंबईत राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी बातमी समोर आली असून, राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या कृषी पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील ६ प्रगतशील शेतकरी आणि १ कृषी अधिकाऱ्याची निवड झाली आहे. शेती, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी सेवाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
राज्य शासनाने सन २०२३ आणि २०२४ या वर्षांसाठी विभागनिहाय कृषी पुरस्कारांची घोषणा केली असून, सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी या यादीत स्थान मिळवले आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कारासाठी भिलार (ता. महाबळेश्वर) येथील गणपत रामचंद्र पारटे, युवा शेतकरी पुरस्कारासाठी निसराळे (ता. सातारा) येथील श्रीकांत महादेव घोरपडे, तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी पाडळी (ता. सातारा) येथील ऋषिकेश जयसिंग ढाणे यांची निवड झाली आहे.
याशिवाय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारासाठी खोजेवाडी येथील सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश रामचंद्र सोनावले, उद्यान पंडित पुरस्कारासाठी सासकल (ता. फलटण) येथील बबन रामचंद्र मुळीक, कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कारासाठी रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील अनंत हनमंतराव माने, तसेच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी सुपने (ता. कराड) येथील हिंमंतराव हिंदुराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यभरातील कृषी क्षेत्रातील नवकल्पना, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, फलोत्पादन आणि शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने सन २०२३ व २०२४ साठी एकूण १८४ शेतकरी, संस्था आणि गटांना विविध पुरस्कारांसाठी निवडले आहे.
निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थ्यांचा १ जुलै २०२६ रोजी मुंबईतील एनएससीआय डोम, वरळी येथे राज्यपालांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे. या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा राज्यस्तरावर पुन्हा एकदा गौरव झाला असून, जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



