१५ जूनपासून साखळी उपोषणाचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'मुळे बाधित होणाऱ्या माळशिरस व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला तीव्र विरोध कायम ठेवला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने, आता शेतकऱ्यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ जून २०२६ पासून माळशिरस तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी कृती समितीने केली आहे.
शक्तीपीठ महामार्गामुळे जमिनी जाण्याच्या भीतीने बाधित शेतकरी सुरुवातीपासूनच धास्तावलेले आहेत. या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्याकडे लेखी स्वरूपात आपल्या हरकती आणि निवेदने सादर केली आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी उपोषणासाठी आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी आणि उपोषणस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माळशिरस तहसीलदारांना अधिकृत निवेदन सादर केले आहे.
आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, "आमच्या बागायती जमिनी या महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. हा प्रकल्प आमच्या हिताचा नसून, तो बळजबरीने लादला जात आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि जमिनींच्या संपादनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही."
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या भावनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आता १५ जूनपासून सुरू होणाऱ्या या साखळी उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



