विठ्ठल भक्तांचा पंढरीचा प्रवास होणार अधिक सुलभ आणि सुखकर
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या वतीने तब्बल ३५० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यंदा भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होतात. या काळात प्रवाशांची गर्दी होऊन गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा, यासाठी एसटी प्रशासनाने आतापासूनच जय्यत नियोजन सुरू केले आहे, अशी माहिती पुणे एसटी विभागाच्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक आयना शेख यांनी दिली.
प्रमुख आगारांमधून सुटणार गाड्याभाविकांच्या सोयीसाठी पुणे जिल्ह्यातील खालील प्रमुख बसस्थानके आणि आगारांमधून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत: शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, शिरूर
'एसटी आपल्या दारी' उपक्रम!
भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने एक विशेष पाऊल उचलले आहे. जर एखाद्या गावातून, वाडी-वस्तीवरून किंवा गृहनिर्माण सोसायटीतून (सोसायटी) वारकऱ्यांचा मोठा गट एकत्र पंढरपूरला जाणार असेल, तर त्यांना थेट त्यांच्या भागातूनच बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे भाविकांना मुख्य बसस्थानकावर येण्याचा त्रास वाचणार आहे.
तिकिटात सवलती लागू राहणार
शासनाच्या नियमांनुसार नियमित बसेसप्रमाणेच या जादा सोडण्यात येणाऱ्या बसेसमध्येही सवलती लागू राहतील:
महिलांसाठी: तिकीट दरात ५०% थेट सवलत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी (७५ वर्षांवरील): संपूर्ण मोफत प्रवासाची सुविधा.
एसटी प्रशासनाने केलेल्या या चोख नियोजनामुळे यंदा विठ्ठल भक्तांचा पंढरीचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



