जल जीवन मिशनचा फज्जा ! धुळदेवमध्ये पाणी टंचाईचे भयान वास्तव समोर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
माणदेशातील अनेक गावांमध्ये सध्या दुष्काळाची तीव्र झळ जाणवत आहे. धुळदेव परिसरात परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत.
शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः जळून जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. अनेक विहिरी आटल्या आहेत, तर जिथे थोडंफार पाणी उपलब्ध आहे तिथूनही लोकांना लांबून पाणी वाहून आणावं लागत आहे. काही गावांमध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की, एक टँकर पाण्यासाठी तब्बल 3 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे.
दरम्यान, गावकऱ्यांकडून तात्काळ टँकर सुरू करावेत अशी जोरदार मागणी होत आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचा पाऊस पडला होता, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन करत पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
हृदय पिळवटून टाकणारे चित्र
रखरखत्या उन्हात, तापलेल्या जमिनीवरून वाळवंटासारख्या माळावरून एक महिला दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालत होती. ही केवळ एका माऊलीची कथा नाही, तर संपूर्ण माण तालुक्यातील अनेक गावांची वेदना आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




