वाई–पाचगणी–महाबळेश्वर रस्त्यामुळे पर्यटन कोलमडण्याची भीती
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई ते पाचगणी व महाबळेश्वर या अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन मार्गाचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन कंत्राटदाराने मंत्रालयात दिले होते. मात्र सध्याची प्रत्यक्ष परिस्थिती पाहता पुढील अवघ्या २० दिवसांत हे काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण पर्यटन हंगाम धोक्यात आला असून स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सध्या या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, अपूर्ण बांधकाम, वाहतुकीतील अडथळे यामुळे पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम हा पाचगणी व महाबळेश्वरसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र यंदा हा संपूर्ण सिझन वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
परिणामी हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स, दुकाने आणि इतर पर्यटनाशी संबंधित उद्योगांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला असताना, उत्पन्न ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही हॉटेल्स बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाई शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची परिस्थिती देखील अत्यंत खराब झाली असून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पर्यटन हंगाम वाचवायचा असेल तर तातडीने युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संपूर्ण पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




