'किसन वीर' च्या कर्मचाऱ्यांना दिली सुरक्षिततेची शपथ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
साखर कारखान्यांसह औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा भाग असून किसन वीर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने दक्ष राहून जाणिवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले.
४ मार्च ते १० मार्च या कालावधीत राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कारखाना कार्यस्थळावर प्रमोद शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची सार्वजनिक शपथ दिली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, सप्ताहाचे अनेक स्वरूप असतात, मात्र औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या स्वरूपाला सांघीक कामगिरीतुन रूप दिल्यास कारखान्यामध्ये होणारे संभाव्य अपघात टाळून वैयक्तिक तसेच संस्थेचा फायदा होत असल्याचे नमूद केले. साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी कौटुंबिक, आर्थिक, मानसिक विवंचना बाजूला ठेऊन कामात मन स्थिर ठेवले तरच अपघात होणार नाहीत. सर्व कामगारांची ही वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी आहे. कामगारांनी औद्योगिक सुरक्षा सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता कायम स्वरूपी ठेवावी. असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करून खबरदारी घेण्याबाबत सूचित केले.
कारखान्याचे एच आर मॅनेजर अरविंद शिंगटे यांनी सुरक्षा सप्ताहाचा हेतु विशद करून कामगारांसाठी कायदे व नियम असले तरी त्यांच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. त्यासाठी आयोजित राष्ट्रीय सरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने किंबहुना वर्षभर कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि संस्थेची सुरक्षा जपण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावेत, असे सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख विभागप्रमख व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




