विठ्ठल कदम यांना नाथांचा प्रसाद मिळाला
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या बावधन येथील बगाड यात्रेचा यावर्षी बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे. बगाड यात्रा येत्या रविवारी दि.8 मार्च रोजी रंगपचमीला निघणार आहे.
बावधन येथे दरवर्षी फाल्गुन महिन्यात तीन दिवस ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथाची यात्रा भरते. यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक असे कार्यक्रम होतात. यावेळी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पोर्णिमेच्या दिवशीच्या रात्री १२ वाजल्यानंतर बगाडया ठरविण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपारिक पध्दतीने कौल लावत असतात. यावर्षी एकूण 61 नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते. यातील 37 व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूने देवाने प्रसाद दिला असून त्यांना यंदाचा बगड्या होण्याचा मान मिळाला आहे.
बगाड्या विठ्ठल सोपान कदम यांनी त्यांचे बंधू रवींद्र सोपान कदम हे आजारी असल्याने व त्याची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी 2010 साली नाथांच्या चरणी नवस केला होता आणि ते 2013 पासून नाथांच्या प्रसादासाठी बसत होते तरी त्यांना या वर्षी नाथांनी प्रसाद दिला त्यामुळे त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला. त्यामुळे संपूर्ण बावधन पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. त्यानंतर काशीनाथाचं चांगभल, असा गजर करत बगाड्याच्या नावाची घोषणा केली आणि बागड्याने मंदिरा भोवती पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




