आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रबळ इच्छाशक्तीला यश; तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारच्या ऐतिहासिक भूमीतील औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि सुशिक्षित तरुणाईचे पुणे-मुंबईसारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी, लिंब-नागेवाडी परिसरात भव्य 'आयटी पार्क' उभारण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा परिसर आता 'औद्योगिक क्षेत्र' म्हणून घोषित झाला असून, सातारच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा प्रकल्प एक 'माइलस्टोन' ठरणार आहे.
राजघराण्याच्या मनोमिलनातून विकासाची दारे खुली
गेल्या ३०-३५ वर्षांपासून सातारकर आयटी पार्कची प्रतीक्षा करत होते. मात्र, आता नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे अनमोल सहकार्य यामुळे या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. राजघराण्याच्या या 'मनोमिलना'मुळे सातारच्या विकासाचे नवे दालन उघडले असून, रखडलेले प्रकल्प आता 'ॲक्शन मोड'वर आले आहेत.
मंत्रालया स्तरावर हालचाली गतिमान
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला आहे. उद्योगमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी शब्द दिला असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नजीकच्या काळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील उद्योग विश्व पुन्हा एकदा कात टाकणार आहे.
तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण
साताऱ्यातील सुशिक्षित तरुण रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर जात असल्याने "तरुण पुण्यात आणि ज्येष्ठ नागरिक साताऱ्यात" अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, लिंब-नागेवाडी येथील आयटी पार्कमध्ये हजारो तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे बाजारपेठांना उभारी मिळेल आणि जिल्ह्याच्या आर्थिक स्तरात मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
विकासाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प
सहकार महर्षी स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी उरमोडी धरणाद्वारे जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडवून नंदनवन केले होते. तोच वारसा पुढे नेत, शिवेंद्रसिंहराजे आता आयटी पार्कच्या माध्यमातून औद्योगिक क्रांती घडवत आहेत. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी हे आयटी पार्क एक महत्त्वाचे साधन ठरणार असल्याचे मत श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय शक्ती पणाला
सातारचा कायापालट करण्यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि स्थानिक नेतृत्वाची धडपड यामुळे लिंब-नागेवाडी परिसराचे चित्र येत्या काही काळात पूर्णतः बदललेले दिसेल.
स्थानिक बाजारपेठेला मिळणार बूस्टर डोस
आयटी पार्क केवळ सॉफ्टवेअर कंपन्यांपुरते मर्यादित नसून, त्याभोवती पूरक उद्योग आणि सेवा क्षेत्राचे जाळे विणले जाईल. यामुळे हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि स्थानिक व्यापार यांना मोठी चालना मिळणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




