वाई तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यासह शहरामध्ये सध्या चोरीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, परप्रांतीय व भुरटे चोर मोकाटपणे धुमाकूळ घालत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या चोरांवर कोणताही पोलिसी धाक राहिलेला नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. गंगापुरी परिसरात भर वस्तीत झालेल्या चोरीचा आजतागायत कोणताही ठोस तपास लागलेला नाही. अनेक कुटुंबांनी एक-एक रुपया जमा करून मुलाबाळांच्या भविष्यासाठी ठेवलेली रक्कम अक्षरशः चोरट्यांनी पळवली, मात्र पोलीस प्रशासनाला आजही आरोपी सापडलेले नाहीत. अशा अनेक चोऱ्या वाई पोलिसांच्या नोंदीत असून, त्यांचा तपास मात्र कागदावरच अडकलेला आहे. वाई शहरातील सराफ कारागिरांच्या दुकानातील मोठ्या चोरी प्रकरणात चोर सापडला, मात्र चोरी गेलेल्या सोन्याचा पत्ता आजही लागलेला नाही. मोठ्या प्रमाणात सोनं गायब झालं असताना केवळ एक-दोन तोळे रिकव्हरी दाखवण्यात आली. यामागचं “गोड बंगाल” नेमकं काय, असा प्रश्न दबक्या आवाजात संपूर्ण वाईकर नागरिक विचारत आहेत. पोलीस पास अधिकाऱ्यांची नार्कोटेस करा व त्यातून सर्व गोष्टी समोर येतील असं वाईकर नागरिक दबक्या आवाजात बोलत असून
मोटार चोरी, केबल चोरी, घरफोडी अशा प्रकारांमध्ये वाढ होत असताना पोलिसांचा कुठलाही ठोस बंदोबस्त दिसून येत नाही. त्यामुळे “चोर- पोलीस खेळ” नेमका कधी थांबणार? चोरी झालेल्या सोन्याचे, पैशांचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
वाई शहरात सध्या कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. तीस ते चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ तीन ट्रॅफिक पोलीस कार्यरत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, धोम धरण परिसरामुळे वाई हे कायम पर्यटकांनी गजबजलेले असते. मात्र ट्रॅफिक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला असून महागणपती परिसर, आमंत्रण चौक येथे रोज वाहतुकीचा खोळंबा होतो.
जिल्ह्याला चार मंत्री व दोन खासदार लाभलेले असताना वाई तालुक्यात मात्र पोलिसांचा फौजफाटा अत्यंत अपुरा आहे. ही परिस्थिती गृह विभागापर्यंत किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचवली का? आणि का पोहोचवली नाही? व त्यांनी यावर काय ठोस उपाययोजना केली जिल्हा पोलीस प्रमुखांनी यावर काय ठोस उपाययोजना केली आहे हा ही मोठा प्रश्न आहे.
राजकीय नेते निवडणुकीपुरतेच वाईत येतात, भाषणं करतात आणि निघून जातात. मात्र वाईकरांच्या रोजच्या जखमा, भीती, असुरक्षितता याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही.
आज वाई शहरातील सामान्य नागरिक असुरक्षिततेच्या छायेत जगतो आहे. घरात चोरी होईल की काय, दुकान फोडले जाईल की काय, वाहन गायब होईल की काय – ही भीती प्रत्येकाच्या मनात आहे. हे सर्व होत असताना वाई तालुक्यातील जनतेकडून दबक्या आवाजात बोललं जात आहे
वाई शहरात तातडीने मोठा पोलिस बंदोबस्त, स्वतंत्र तपास पथक, सीसीटीव्ही नेटवर्क, रात्रगस्त आणि ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा “वाई शहराला अच्छे दिन कधी येणार?” हा प्रश्न फक्त वर्तमानपत्रातच नव्हे तर प्रत्येक वाईकराच्या मनात कायमचा कोरला जाईल.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




