‘शाश्वत विकासासाठी युवकांनी जल-मृद संवर्धनाचे दूत बनावे’ - कृषी व हवामान तज्ञ डॉ. उदय देवळाणकर
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
"हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलव्यवस्थापन आणि मृदसंवर्धन ही काळाची गरज आहे. युवकांनी विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन स्वीकारून ग्रामीण भागातील पडीक जमिनींचे पुनरुज्जीवन आणि पाणलोट व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घ्यावा," असे प्रतिपादन प्रसिद्ध कृषी व हवामान तज्ञ डॉ. उदय देवळाणकर यांनी केले.
मौजे दाभाडी (ता. कन्नड) येथे शिवाजी महाविद्यालय, कन्नड च्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागामार्फत आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “शाश्वत विकासासाठी युवक, पडीक जमीन व पाणलोट व्यवस्थापन” या विषयावर हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले होते. व्यासपीठावर मुक्तारभाई शहा (पंचायत समिती सदस्य), श्रीमती अकिलाबी शहा (सरपंच), कचरू शिरसाठ (पोलीस पाटील), अनिल शिरसाठ (पत्रकार), मधुकर अदिक (उपसरपंच), फुलचंद मुंडे (ग्रामविकास अधिकारी) यांच्यासह परिसरातील मान्यवर श्री अरुण अदिक, बाबुरावजी अदिक, कार्तिकाना दाबके, पोपटराव दापके, गणपतराव खरे व शिंदे काका उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. शिबिराची प्रस्तावना डॉ. राकेश अहिरराव यांनी मांडली. त्यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करताना पडीक जमीन आणि जलसंधारणात युवकांच्या भूमिकेवर भर दिला.
युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवणारे शिबिर
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय भोसले म्हणाले की, एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पर्यावरणाचे रक्षण करत समाजसेवेच्या मार्गाने शाश्वत विकास साधणे हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे.
सात दिवसांचा भरगच्च कार्यक्रम
या शिबिरामध्ये केवळ व्याख्यानेच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने
- पडीक जमिनीचे शास्त्रीय सर्वेक्षण.
- श्रमदानातून जलसंधारण व बंधारे स्वच्छता.
- वृक्षारोपण आणि ग्रामस्वच्छता अभियान.
- पर्यावरण आणि जलसाठवण तंत्रावर तज्ञांचे मार्गदर्शन.
नियोजन आणि सहभाग
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबिर कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव, डॉ. सीमा काशीद परिश्रम घेत आहेत. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. बी. के. मगर, ग्रंथपाल डॉ. संतोष देशमुख यांच्यासह विविध विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन स्वयंसेविका जानवी गाडे हिने केले, तर यश पाटील याने उपस्थितांचे आभार मानले. दाभाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने या शिबिराचा शुभारंभ अत्यंत प्रेरणादायी वातावरणात झाला.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



