अस्मानी संकटाने बळीराजा पूर्णपणे खचला
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधीआरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यात बुधवारपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले. तालुक्यातील देऊळगाव कोळ भागांत ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. शेकडो हेक्टर शेतीमधील पिकाचे प्रचंड नुकसान झाले विहिरी खचल्या सोयाबीन आणि स्प्रिंकलरचे सेट वाहून गेला अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णपणे खचला असून तात्काळ सर्वे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे
याबाबत माहिती अशी की देऊळगाव कोळ गावांच्या शिवारात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले असून अनेक ठिकाणी मातीची धूप झाली आहे. हळद कापूस, सोयाबीन, मका, तूर अशा प्रमुख खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. काही भागांत तर पाणी अजूनही शेतात साचलेले आहे.
ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे व शेतातील बांधांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे आता आर्थिक संकट उभं राहिलं आहे. महसूल प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदतकार्य सुरु करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
समृद्धी महामार्ग लगत शेतीचे नुकसान
समृद्धी महामार्गामुळे शेतातील रस्ते बदलले त्यामुळे पाणी जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे पाणी आडल्यामुळे शेतात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे त्यामुळे समृद्धी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा