लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून लगीनघाई सुरू आहे
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - शिंदे गटाकडून महायुतीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार म्हणून बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली.मात्र त्यांचा परिचय हा केवळ हदगाव पुरताच असून लोकसभा मतदारसंघात अपरिचित असल्याने मतदारकडून कसा कौल मिळणार हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, सध्या निवडणुकीची लगीनघाई सुरू आहे. या लगीनघाईत
हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून शिंदे गटाचे बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय वंचित आघाडिकडून बी. डी. चव्हाण तर भाजपातून बंडखोरी केलेले शिवाजी जाधव यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत होते, तसे त्यांनी कामे ही सुरू केली. हळद प्रकल्प असो की, बंधारे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पाच वर्षात उत्कृष्ट कामगिरी असतानाही ऐन वेळी त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या नेत्यांकडून विरोध दाखविला गेला. उमेदवार बदला अन्यथा भाजप ही जागा लढवेल असा पवित्रा घेतला. याचा अर्थ असा की हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला सबशेल भाजपने विरोध केला. त्यामुळे हेमंत पाटील यांनी तातडीने लोकसभा मतदारसंघातील हजारो समर्थकासह मुंबईला जाऊन आले. तरीही काही फरक पडला नाही. अखेर भाजपच्या विरोधाला मुख्यमंत्री शिंदे हे बळी पडले आणि हेमंत पाटील ऐवजी बाबुराव कदम यांना लोकसभेची उमेदवारी बहाल करण्यात आली. त्या बदल्यात हेमंत पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलून वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान ,विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना विरोध केल्यानंतर बाबुराव कदम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचाराचा नारळ जरी फुटला तरी ते लोकसभा मतदारसंघात अपरिचित असे उमेदवार असल्याने त्यांना मतदान कसे होईल ,केवळ ते हदगाव पुरतेच ओळखत आहेत.त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोणीही ओळखत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर हे महाविकास आघाडीकडून आपले नशीब आजमावत आहेत, त्याचप्रमाणे वंचित कडून डी. बी. चव्हाण तर भाजपचे बंडखोरी केलेले ऍड. शिवाजी जाधव हे ही आपली अखेरची निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक अटीतटीची होणार यात शंका नाही.
दरम्यान, लोकसभा मतदारसंघात भाजपने मागील तीन वर्षांपासून बूथ लेव्हल पासून ते पक्ष संघटन वाढीसाठी काम केले आहे. त्यामुळे भाजपचे रामदास पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली,परंतु भाजपचे शिवाजी जाधव हे अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने महायुतीला धोका आहे. तर वंचित कडून महाविकास आघाडीला फटका बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होणार आहे. भाजप मतदार अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांच्या पाठीशी उभा राहिल्यास जाधव यांच्या मताधिक्यात वाढ होईल. अन ही निवडणूक काट्याची होईल यांत दुमत नाही. मात्र महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांना मतदारांचा संपर्क नसल्याने त्यांना मते कशी पडणार हा ही संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे शिवाजी जाधव वगळता सर्व उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील असल्याने मतदारांना अपरिचित आहेत. त्यामुळे शिवाजी जाधव हेच लोकसभा मतदारसंघात सर्व दूर परिचित असल्याने त्यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या हिंगोली सह अन्य ठिकाणी ओळख किंवा संपर्क नसल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार हे मात्र निश्चित आहे. महायुतीत अगोदरच जागेवरून नाराजी नाट्य सुरू होते. भाजपाला जागा सोडण्यासाठी भाजप नेते अनेक वेळा मुंबई वारी देखील केली. मात्र त्यांना युतीत ही जागा सेनेकडे असल्याचे सांगून शांत करण्यात आले. त्यामुळे भाजप नेते अद्यापही नाराज असून त्यांची नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार हे लवकरच स्पस्ट होईल.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा