"संस्कृति - परंपरा जपताना सर्वांनाच आनंद मिळत असतो.” - रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर ( हुसेन मुलाणी )
“ज्यावेळी आपण आपली संस्कृति आणि परंपरा जपत असतो त्यावेळी आपल्या बरोबर सर्वांनाच आनंद मिळत असतो .” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या बाळगोपाळांच्या बोरन्हाण प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले - “सूर्याच्या मकरसंक्रमणावेळी वातावरणात अनेक बदल होत असतात. त्यामुळे बाळगोपाळांना निसर्गातील उपलब्ध फळे व सकस आहार मिळावा. तसेच त्यांच्या आवडीचे चुरमुरे - बत्तासे, सेवनाचा आनंद मिळावा यासाठी बोरन्हाण हा सोहळा परंपरेनुसार सुरू ठेवणे आवश्यक आहे.”
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या परिसरातील बाळगोपाळांसोबत सोनार परिवारातील नात कु. सानवी संदेश सोनार हिच्या बोरन्हाण प्रसंगी कवी सचिन कुलकर्णी, निषाद प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मनिषाताई कुलकर्णी, समाजसेवक डॉ. सचिन लादे, सौ. अंजलीताई लादे, स्वाद फुडचे उद्योजक श्री. संजय कुलकर्णी, सौ. दिपालीताई कुलकर्णी, कवी गणेश गायकवाड, गोपाळ माळी, रॉबिन हूड आर्मीचे स्वयंसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
मकरसंक्रमणाचे औचित्य साधून किंक्रांत दिवशी संपन्न झालेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कु. रेवती सोनार, चि. ओंकार सोनार, कु. शिवरंजनी कुलकर्णी आणि कु. सुरभी कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. सोनार दांपत्य आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून संपन्न झालेल्या बोरन्हाण सोहळ्यामुळे परिसरातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा