जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यात घेतली पदाधिकारी आणि मातब्बर नेत्यांची बैठक
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेले भगीरथ भालके जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथे जिल्ह्यातील मातब्बर नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली आहे. येऊ घातलेल्या दूध संघ आणि इतर सर्वच निवडणुकात आपण एकजुटीने व एक दिलाने भाग घेतला पाहिजे, तरच आपण विजय खेचून आणू ,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आहे.
पोट निवडणुकीनंतर साधारण सहा ते सात महिने भगीरथ भालके नॉटरिचेबल होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक कोंडी फोडून कारखाना सुरू करण्याच्या प्रयत्नात, भगीरथ दादा मुंबईत तळ ठोकून असल्याचे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान भगीरथ भालके यांचे विरोधक आणि काही संचालकांनी या कालावधीत भगीरथ भालके यांच्यावर टीका करण्यात तसूभरही कसर ठेवली नव्हती. मात्र दादांकडून कुठलीच प्रतिक्रिया यादरम्यान आली नाही. परंतु दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांनी राजकारणात जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे भालके गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र भगीरथ दादा माध्यमांच्या समोर येणार का ? आलेच तर कारखान्याच्या सद्यस्थितीवर काय बोलणार ? याबाबत मात्र स्पष्टपणे काही समजले नाही. त्यामुळे दादांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा