महिला, बालकल्याण विभागात योजनांचा सुकाळ
शिक्षण , व्यवसाय , स्वयंरोजगारासाठी ही अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा
![]() |
zilha parishad solapur |
सोलापूर - ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत अनेक नव्या योजनांची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यामुळे अनेक निर्णयात बदल झाला असून ग्रामीण भागातील महिलांना अर्थसहाय्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी होस्टेल करिता सात हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा हजार रुपये एकरकमी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवतींचा शिक्षणाचा कल वाढेल , अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण या योजनेमध्ये ज्यूडो- कराटे , योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी 600 रुपयांऐवजी 1000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणका बाबतचे ज्ञान , कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंब तसेच पन्नास हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील देण्यात येत होता. आता कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा एक लाख 20 हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवतींना व्यापक तिने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बालवाडी व अंगणवाडी सेविका , मदतनीस , पर्यवेक्षिका , आशा वर्कर आणि जिल्हा परिषद अंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेला वार्षिक पंधरा लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत पिठाची गिरणी , सौर कंदील , शिलाई मशीन, फॉल पिको मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार पल्वराईझर ( ओले ,/ सुके वुळण यंत्र ), पशुधन संगोपन जात शेळी पालन, कोंबड्या पालन, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मिल, घरगुती फळ प्रक्रिया उद्योग, घरगुती मसाला उद्योग साहित्य पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील उपेक्षित महिलांना या योजनेची संधी आली आहे .मंजूर असलेली वस्तू खरेदी करताना प्रति महिला जास्तीत जास्त वीस हजार रुपयांनी ऐवजी आता तीस हजार रुपये खर्च देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
अनाथ अथवा एकल पालक (आई किंवा वडील )असलेल्या तसेच अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी शालेय साहित्य , दप्तर, शालेय फी व इतर आवश्यक खर्चासाठी डी बी टी द्वारे दोन हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदे विषयक प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शकांनादोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मानधन देण्यात येत होते. आता तज्ञ मार्गदर्शकांना एक हजार रुपयांपर्यंत मानधन तसेच प्रवास भत्ता व महागाई भत्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा