पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे - प्रणव परिचारक
पंढरपूर (प्रतिनिधी) (कबीर देवकुळे) - "सध्याच्या काळात समाज माध्यमांचा प्रभाव वाढला आहे. आपला प्रभाव टिकविण्यासाठी, पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी लागणाऱ्या साधनांची उपलब्धी करून , बदलत्या पत्रकारितेकडे लक्ष द्यावे", असे मत पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले .ते पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूरमधील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, डीव्हीपी उद्योगसमूहाचे उद्योजक अभिजीत पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आदी मान्यवर उपस्थित होते.
बुधवार दि.६ जानेवारी रोजी पंढरपूरमधील पत्रकार भवन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला .पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती तसेच पंढरपूर पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन, उपस्थित मान्यवर तसेच पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत कुंभार आणि संरक्षण समितीचे अध्यक्ष जाकिर नदाफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजकीय आणि प्रशासकीय दिग्गजांच्या वैचारिक दृष्टिकोनाची मोठी घुसळण, या कार्यक्रमात पहावयास मिळाली.
पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सध्याची बदलती पत्रकारिता यावर प्रणव परिचारक यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या पत्रकारांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पत्रकारितेमध्ये समाज माध्यमांचा वाढता प्रभाव चिंतेची बाब ठरत आहे याचा परिणाम निश्चितच व्रतस्थ पत्रकारांवर होत आहे याकरिता पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे याकरता याकरिता आवश्यक त्या साधनांची उपलब्धी करणे आवश्यक असल्याचे मत प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले पत्रकारांना भेडसावत असलेल्या आर्थिक समस्यांबाबत बोलताना त्यांनी समाजातील राजकीय आणि सामाजिक घटक कायमच पत्रकारांसोबत असल्याचे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून उभे ठाकलेल्या, आजच्या पत्रकारांमध्ये खूप काही वाखाणण्यासारखे आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डोकावण्याची त्यांची क्षमता निश्चितच समाजउपयोगी असल्याचे मत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले. "पंढरपूरच्या पत्रकारांनी तीर्थक्षेत्र पंढरीचे ब्रँडिंग कसे होईल , याचा अभ्यास करून लिखाण करावे. पंढरीस वैभव प्राप्त झाल्यास येथील अर्थकारण मजबूत होईल. याचा फायदा सर्वसामान्यांसह पत्रकारांनाही होईल" ,असा आशावाद उद्योजक अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी आपला प्रशासकीय दृष्टिकोन व्यक्त केला. "समाजाची गरज पत्रकारांनी अवश्य मांडावी. चुकणाऱ्या प्रशासनास जागे करावे. सुधारणा होत असताना कोणाचे तरी हितसंबंध गुंतल्यामुळे यास विरोध होतो. आणि हा विरोध पत्रकारांनी समाजासमोर समाजहित डोळ्यासमोर ठेवून मांडावा. यामुळे प्रशासनाचे खच्चीकरण नाही , याची काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारांच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन दिले.
या पत्रकारदिनाच्या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे, अविनाश साळुंखे ,अपराजित सर्वगोड, भगवान वानखेडे ,कबीर देवकुळे ,विजय कांबळे आदींसह दोन्ही पत्रकार संघाचे बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा