खाण-क्रशर प्रकल्पाविरोधात बावधन परिसरातील महिला आक्रमक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
बावधन, कणूर, देरेवाडी, अनपटवाडी, म्हातेकऱवाडी,, पांढरेचीवाडी व परिसरातील महिला ग्रामस्थांनी प्रस्तावित खाण व क्रशर प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित वाई तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह शेती, पाणी व पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांची सविस्तर सुनावणी घेऊनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
परिसरातील रस्ते अनेक ठिकाणी अरुंद असून प्रस्तावित प्रकल्पामुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. धनगरवाडा, नदीचा स्टॉप, एस.टी. स्टँड तसेच दोन शाळांच्या परिसरातून लहान मुले व नागरिकांची सतत ये-जा असते. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी अवजड वाहनाच्या अपघातात एका कुटुंबाने आपला आधारवड गमावल्याची घटना घडली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी वाहतूक सुरक्षेचा स्वतंत्रपणे व गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
खाण-क्रशरमुळे निर्माण होणारी धूळ व प्रदूषण, पाण्याचा प्रश्न, शेतीवरील संभाव्य परिणाम आणि पर्यावरणाची हानी याकडेही ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विशेषतः महिलांनी मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ठामपणे मांडला असून, शाळेत गेलेली मुले सुखरूप घरी परत येईपर्यंत पालकांची चिंता कायम राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
“काही व्यक्तींना रोजगार मिळू शकतो; मात्र त्यासाठी गावाची सुरक्षितता, शेती, पाणी आणि पर्यावरणाची किंमत मोजणे योग्य नाही,” अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रस्तावित खाण व क्रशर प्रकल्पासंदर्भात सर्व ग्रामस्थांची सविस्तर सुनावणी घ्यावी, प्रकल्पामुळे होणाऱ्या वाहतूक, धूळ, प्रदूषण, पाणी, शेती व पर्यावरणावरील परिणामांचा सखोल आढावा घ्यावा, तसेच शाळा, एस.टी. स्टँड, वस्ती व अरुंद रस्त्यांच्या सुरक्षेचा स्वतंत्र विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सर्व शासकीय परवानग्या, पर्यावरणीय अटी व वाहतूक सुरक्षेच्या निकषांची प्रत्यक्ष पाहणी करूनच पुढील कार्यवाही करावी आणि ग्रामस्थांच्या हरकतींचा विचार होईपर्यंत प्रकल्पासंदर्भातील पुढील कार्यवाही स्थगित ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
“आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गावाच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी शांततामय व लोकशाही मार्गाने लढा देत आहोत,” असे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























