शाळांच्या आधुनिकीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मिशन मोडचा आदेश
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था उभारण्यासाठी आता अधिक वेगाने काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या तब्बल चार तासांच्या बैठकीत राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्यातील शाळांची सद्यस्थिती, शिक्षण विभागाच्या विविध योजना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले उपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. चांगल्या उपक्रमांचे कौतुक करतानाच ते केवळ कागदोपत्री न राहता राज्यातील प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
आमदार-खासदारांनी शाळा दत्तक घ्याव्यात
शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेऊन त्यांच्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. दत्तक घेतलेल्या शाळांच्या प्रगतीचा नियमित, विशेषतः दर आठवड्याला, आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यावर भर देण्यात आला.
शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नको
आजच्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यातील गरजा वेगाने बदलत आहेत. त्यामुळे शाळांमधील शिक्षणपद्धतीतही त्यानुसार बदल होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास साधणारी शिक्षणव्यवस्था उभारण्याची गरज शिंदे यांनी अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन, मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रमांचा अधिक प्रभावीपणे लाभ मिळावा, यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पालक, समाज आणि उद्योगांचाही सहभाग
शाळांच्या विकासात केवळ शासनाची भूमिका पुरेशी नसून पालक, माजी विद्यार्थी, स्थानिक समाज आणि उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला. शाळांच्या भौतिक सुविधांसोबतच तंत्रज्ञान, कौशल्यविकास, प्रशिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर वाढविण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राशी सहकार्य करण्याचा निर्णयही बैठकीत चर्चिला गेला.
शिक्षकांवर मोठी जबाबदारी
शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनात शिक्षकांची भूमिका निर्णायक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि आधुनिक अध्यापन साधने उपलब्ध करून देतानाच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा योग्य सन्मान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ‘शाळा बदलली तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थी बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल’, या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात मिशन मोडवर काम करण्याची दिशा या बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




























