"कामगार हक्क आपल्या दारी" उपक्रमातून समस्या सोडविण्यावर भर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि विविध कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिवसेना शिव कामगार सेनेच्या वतीने "कामगार हक्क आपल्या दारी" ही विशेष जनसंपर्क मोहीम जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हा संघटक योगेश आनंदराव फाळके यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रांना नियमित भेटी देऊन कामगारांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या जाणार आहेत. कामगारांच्या तक्रारींची थेट नोंद घेऊन संबंधित शासकीय विभागांकडे त्यांचा पाठपुरावा करण्यात येणार असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
तसेच ईएसआयसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), वेतन, बोनस, कामगार सुरक्षा, कामगार कायदे, कंत्राटी कामगारांचे प्रश्न आणि इतर कामगार हक्कांबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी आणि त्यांना आवश्यक ती मदत सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार संपर्क व मदत केंद्र उभारण्याचा संकल्पही या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे.
यावेळी योगेश फाळके म्हणाले की, "कामगार हा उद्योगाचा कणा असून त्याच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना कामगार सेना नेहमीच अग्रस्थानी राहील. 'कामगार हक्क आपल्या दारी' या उपक्रमातून प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे."
या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील हजारो कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण होण्यासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शिवसेना कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



