"मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन सोडून आमच्या अंत्ययात्रेला यावे"; आंदोलनकर्त्यांचे भावनिक आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
साताऱ्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी रिपब्लिकन सेनेने प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन करत संताप व्यक्त केला. तारेवरची कसरत करून जमा केलेले पैसे भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी सांगितले की, सात दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. "भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या पगारात भागत नसल्यामुळे आम्ही तारेवरची कसरत करून जमा केलेले पैसे त्यांना देणार आहोत," असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
तसेच, ९ जुलै रोजी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आणि महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सात दिवस उपोषण करूनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करत रमेश उबाळे म्हणाले, "आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसेल आणि अशी वेळ आमच्यावर आलीच, तर उद्या काही अनुचित घटना घडल्यास आमच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून साताऱ्यात यावे."
दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



