ज्ञानोबा-तुकारामांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज - वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य
शिवशाही वृत्तसेवा, सातारा - प्रतिनिधी शुभम कोदे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पवित्र पालखी सोहळा १५ ते १९ जुलैदरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने लाखो वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी पाडेगाव येथील दत्त घाट तसेच लोणंद येथील पालखीतळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन विविध सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी वारकरी बांधवांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त वातावरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याच्या पाण्याची अखंड व्यवस्था, आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर्स, फिरती वैद्यकीय पथके, सुसज्ज रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, स्वच्छता मोहीम, चोख पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसेच विविध विभागांच्या सेवांची माहिती देणारे मार्गदर्शक फलक उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्कामस्थळी वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, समतेचा, श्रद्धेचा आणि सेवाभावाचा जिवंत उत्सव असून, प्रत्येक वारकऱ्याची सेवा हीच माऊलीची सेवा मानून सातारा जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



