तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
शिवशाही वृत्तसेवा,सातारा(प्रतिनिधी शुभम कोदे )
महाबळेश्वर तालुक्यातील नाव्हली व विवर गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन जमीन खचलेल्या व गावाच्या पाणीपुरवठा टाकीलगतचा मोठा भाग कोसळल्याने भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीचा आढावा घेत मंत्री पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



