कास जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा तूर्तास ठप्प
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. सांबरवाडी येथे झालेल्या भीषण भूस्खलनामुळे कास धरणातून शहराकडे येणारी मुख्य पाईपलाईन पूर्णपणे बंद पडली आहे. परिणामी, सातारा शहरातील एका मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे खंडित राहणार असल्याची अधिकृत माहिती सातारा नगरपरिषदेने दिली आहे.
कास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गुरुकुल टाकी, कात्रेवाडा टाकी, व्यंकटपूरा टाकी, भैरोबा टाकी परिसर, झोपडपट्टी भाग, पॉवर हाऊस परिसर, डोंगरभाग, पोळवस्ती तसेच सर्व डोंगराळ भागांतील वस्त्या आणि सोसायट्या, या भागातील सर्व शाळा, रुग्णालये, सार्वजनिक संस्था आणि गुरुत्व नलिकेवरून थेट जोडणी घेतलेले सर्व नळधारक यांचा पाणीपुरवठा बंद राहील, असे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. भूस्खलनामुळे गाडलेली आणि बाधित झालेली जलवाहिनी शोधून, तिची गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.
"जलवाहिनीचे नुकसान मोठे असल्याने दुरुस्तीसाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत सातारा शहरातील नागरिकांनी उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व जपून करावा. प्रशासनाला सहकार्य करावे तसेच पाणी जपून वापरा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि नगरपालिकेच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवा," असे आवाहन मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



