सातारा जिल्ह्यातून निवड झालेले एकमेव मानकरी; २५ हजारांचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन होणार सन्मान
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या २०२४ च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय 'विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी' सातारा जिल्ह्यातून हणमंत सिताराम ढवळे यांची अंतिम निवड झाली आहे. या पुरस्काराचे सातारा जिल्ह्यातील ते एकमेव मानकरी ठरले असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री. ढवळे हे वाई येथील नामांकित 'गरवारे टेक्नीकल फायबर्स' कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून १६ जून रोजी सन २०२४ च्या पुरस्कारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ५१ गुणवंत कामगारांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातून केवळ हणमंत ढवळे यांनी बाजी मारली आहे.
अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो. श्री. ढवळे यांनी साहित्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा तसेच इतर विविध सामाजिक आघाड्यांवर केलेल्या बहुमूल्य व अष्टपैलू योगदानाची विशेष दखल घेऊन मंडळाने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप अत्यंत मानाचे असून, यामध्ये विजेत्याला २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह (स्मृतिचिन्ह) आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
हणमंत ढवळे यांच्या या अभूतपूर्व यशामुळे आणि राज्यस्तरीय निवडीमुळे गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल औद्योगिक, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक अशा विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()



