ऐरोलीचे जवान विक्रम चव्हाण यांनीही गमावला प्राण, बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवरील घटना
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका दुर्दैवी अपघाती स्फोटात कराड तालुक्याचे सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव (रा. शहापूर) यांच्यासह महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उरी सेक्टरमधील कमलकोट भागातील लष्करी छावणीत काल संध्याकाळी एका अपघाती स्फोटाची दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते.
जखमी जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे रहिवासी जवान अर्जुन राजेंद्र जाधव आणि ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथील रहिवासी जवान चव्हाण विक्रम बालकृष्ण यांचा समावेश होता. स्फोटानंतर दोन्ही जखमी जवानांना तातडीने श्रीनगरमधील बदामीबाग छावणीतील लष्करी रुग्णालयात हवाई मार्गाने हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र तैनात असलेल्या कराडच्या शहापूर येथील अर्जुन जाधव यांच्या निधनाने गावावर आणि परिसरात तीव्र शोकभावना व्यक्त होत आहेत. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण जवानाला गमावल्याचे मोठे दुःख संपूर्ण तालुक्याला आहे.
जवान अर्जुन जाधव यांच्या वीरमरणाचे वृत्त आज सकाळी कराड तालुक्यात आणि विशेषतः त्यांच्या शहापूर गावात पोहोचताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील बाजारपेठा आणि व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून, संपूर्ण तालुका आपल्या लाडक्या वीराला निरोप देण्यासाठी स्तब्ध झाला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



