ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्नशील असून, येत्या वर्षभरात १५ लाख नवीन घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही
मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले की, घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे निधीची कोणतीही कमतरता नाही. लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, याची ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी राज्यात गेल्या वर्षभरात विक्रमी ६ लाख ५ हजार ५६९ घरकुले यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत, ज्याचा फायदा ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना झाला आहे.
भूमीहीन लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद
ग्रामीण भागात ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, अशा भूमिहीन लाभार्थ्यांसाठी शासन सकारात्मक निर्णय घेत आहे. त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवत असून, जागा खरेदी करण्यासाठी प्रति लाभार्थी १ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. यामुळे अनेक रखडलेले घरकुलांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
शासनाची कटीबद्धता
ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गरिबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. घरांच्या बांधकामात सौर ऊर्जेचा वापर करणे आणि लाभार्थ्यांना मनरेगासारख्या योजनांतून मजुरीचा लाभ मिळवून देणे, यावरही विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसह घरांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



