पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पत्रकारांच्या मागण्या पोहोचवण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
शिवशाही वृत्तसेवा, पणजी (गोवा) विशेष प्रतिनिधी
देशाला 'विकसित भारत' बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी पूर्ण होणार नाही, तर त्यासाठी सत्याची कास धरणाऱ्या डिजिटल मीडियाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. माहितीच्या या युगात डिजिटल मीडियाने केवळ 'व्हायरल' होण्याच्या मागे न धावता, नितिमत्ता, कर्तव्यभाव आणि सखोल संशोधनाची सांगड घालून राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पणजी येथील ऐतिहासिक कला अकादमीत आयोजित तिसऱ्या 'राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
संशोधनाअभावी पत्रकारिता अपूर्ण - डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "तुमची बातमी इतिहासाला साक्षी ठेवून भविष्याचा वेध घेणारी असावी. सखोल संशोधनाशिवाय दिलेली माहिती ही पत्रकारिता ठरू शकत नाही." तसेच, डिजिटल मीडिया संपादकांच्या प्रलंबित मागण्यांचे पत्र आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पत्रकारांचा महाकुंभ
संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिसरे अधिवेशन पार पडले. यापूर्वी भिलार आणि कन्हेरी मठ येथे झालेल्या अधिवेशनांनंतर गोव्यात झालेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह गुजरात आणि तेलंगणा राज्यातील शेकडो पत्रकार उपस्थित होते. राजा माने यांनी संघटनेची गेल्या चार वर्षांतील वाटचाल आणि डिजिटल मीडियासमोर असलेली आव्हाने मांडली.
विचारमंथन आणि प्रकट मुलाखत
परिसंवाद:
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात विविध वैचारिक विषयांवर चर्चा झाली परिसंवादात 'पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हाने' या विषयावर 'कोकणसाद'चे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी मार्गदर्शन केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप या विषयावर ॲड. संदीप कागदे यांनी सविस्तर माहिती दिली.
ॲड. नकुल पार्सेकर आणि सौमित्र देसाई यांनी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सखोल मार्गदर्शन केले.
प्रकट मुलाखत:
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची राजा माने यांनी घेतलेली मुलाखत या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण ठरली. राजा माने यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री उदय सामंत यांनी दिलखुलास उत्तरे देतानाच राजकारणातील डावपेच, गुंतागुंत आणि बारकावे उलगडून दाखवले.
'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' चे वितरण
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:
निलेश सांबरे (ग्रामसेवा), डॉ. महुवा साहा (शास्त्रज्ञ), कमलाकांत तारी (गोवंश संवर्धन). गुरुप्रसाद पावसकर (दिव्यांग सेवा), विकास देशमुख (आरोग्य), चित्रा क्षीरसागर (साहित्य).
संस्थात्मक पुरस्कार: ग्रामविकास संस्था नागझरी, सातारा (जलसंधारण). यासोबतच कमलेश बांदेकर, प्रकाश कुलकर्णी, प्रा. विशाल गरड, राधा खताळ यांच्यासह अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद तानावडे, आयुष्मान भारत योजनेचे डॉ. ओमप्रकाश शेटे, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, रामकृष्ण वेताळ, सागर चव्हाण उपस्थित होते. विकास भोसले यांनी प्रास्ताविक केले, श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले, तर सागर चव्हाण यांनी आभार मानले.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




