विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा बाजार
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जे.ई.ई. नीट आणि नागरी सेवा (यूपीएससी एम पी एस सी) यासारख्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थी अहोरात्र परिश्रम घेऊन उज्वल करिअरचे स्वप्न पाहत असतात. अर्थात यासाठी हे विद्यार्थी कोचिंग क्लासेसचा आधार घेतात. भरमसाठ फी भरून विद्यार्थी या क्लासमध्ये आपले नशीब घडवण्याचे स्वप्न पाहत असतात. शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच भविष्यातील करिअरची दिशा ठरवून हे विद्यार्थी कोचिंग क्लासच्या भरवश्यावर राहून आपली दिशा ठरवत असतात. कोचिंग क्लासेस मधील तीव्र स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब हे क्लासेस वाले करीत असतात. यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग फंडा चा वापर केला जातो. आपल्या क्लासेस चे नाव मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी क्लासेसचे संचालक वाटेल त्या थराला जाण्याची त्यांची तयारी असते. यामुळे निर्माण होणाऱ्या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थात कोचिंग क्लासेसच्या तीव्र स्पर्धा या आता विद्यार्थ्यांना मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. राजस्थान (कोटा) हे मेडिकल इंजिनिअरिंग व स्पर्धा परीक्षेचे हब बनले असताना या क्षेत्रात भ्रष्टाचाराची लागलेली वाळवी या क्षेत्राला पोखरत आहे. देशात नीट परीक्षेचा झालेला घोटाळा पाहता आता शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. कोचिंग क्लासेस आणि संबंधित यंत्रणा यांचे मधुर संबंध उघड झाल्याने क्लासेस वाल्यांचे पितळ आता उघडे पडले आहे. पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा झालेला विश्वासघात पाहता शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार कोणत्या थराला पोहोचला आहे हे आता सर्व सामान्यांपर्यंत समजू लागले आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कोचिंग क्लासेस संचालक आणि संबंधित यंत्रनांचे असलेले लागेबांधे व त्यामुळे तेथील क्लासेसचा लागणारा 100% निकाल पाहता पेपर फुटी ला एक प्रकारे बळकटीच मिळत आहे. महाराष्ट्रातील नांदेड,पुणे,लातूर ही शहरे कोचिंग क्लासेसचे हब बनलेली आहेत परंतु नीट परीक्षेच्या पेपर फुटी मुळे या हबचा फुगा फुटला आहे. कोचिंग क्लासेस मागील दहा वर्षात सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झालेले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तेची आमिषे दाखवून एक प्रकारे विद्यार्थ्यांची लूट हे क्लासेस वाले करीत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. पेपर सेटिंग करणाऱ्यांकडून पेपर खरेदी करणे व त्यावर आपल्या क्लासेसचे निकाल वाढवून घेणे आणि समाजात आमचे क्लासेस किती दर्जात्मक आहेत हे सिद्ध करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणे हेच क्लासेस वाल्यांचे मुख्य हेतू व उद्दिष्टे असल्याचे आता नीट च्या पेपर फुटी मुळे सिद्ध झाले आहे. शिक्षण व्यवस्थेतील खालवलेला हा दर्जा शिक्षण व्यवस्थेलाच मारक ठरत आहे. नैतिक मूल्यशिक्षण हे फक्त आता कागदपतत्री राहिले असून जीवनात नैतिक मूल्यांची घसरण झाल्याचे नीट पेपरच्या फुटीने पुन्हा एकदा समोर आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये विद्यार्थी मात्र भरडला जात आहे ही दुर्दैवी बाब आहे. क्लासेस वाल्यांची चढाओढ पाहता यावर संबंधित यंत्रणेने अंकुश ठेवणे आता गरजेचे वाटू लागले आहे. टॉपर व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांच्या मोठमोठ्या जाहिराती करून केवळ आर्थिक लाभ मिळवणे हाच हेतू हा क्लासेस वाल्यांचा असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या फीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये गोळा करणारे हे क्लासेस वाले शिक्षण संस्कृतीला गालबोट लावत आहेत. अक्षरशा लाखो रुपये फी घेऊन विद्यार्थ्यांची लूट ही राजरोसपणे चालू आहे. कोचिंग क्लासेसच्या फोफावलेल्या जाळ्यात विद्यार्थी व पालक कळत नकळत सापडत आहेत. त्याचाच फायदा घेत हे क्लासेस वाले त्यांचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही वाळवी वेळीच रोखली नाही तर भविष्यात भारतीय शिक्षण व्यवस्थेचे मात्र तीन तेरा वाजणार हे निश्चित.
श्रीरंग काटेकर, सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



