इरा चव्हाण हिचा राज्यात सहावा क्रमांक - यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात यथोचित गौरव
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) परीक्षा २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत सातारा जिल्ह्यातील लिंब येथील गौरीशंकर नॉलेज सिटी संचलित डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णयश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील तब्बल ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले असून, त्यांनी आपल्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या राज्यस्तरीय परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी इरा रवींद्र चव्हाण हिने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत राज्यस्तरावर सहावा क्रमांक पटकावला. तसेच शरयू संजय चोरट हिने जिल्हास्तरावर पाचवा, तर अवधूत संदीप विभुते याने आठवा क्रमांक प्राप्त करून विशेष यश मिळवले.
केंद्रस्तरावरही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला दबदबा कायम राखला आहे. यामध्ये कृष्णाई संतोष साबळे, सर्वेश समाधान भोसले, अनुश्री गणेश फरांदे, आराध्या अमोल जाधव आणि काव्या श्रीमंत साळुंखे यांनी केंद्रस्तरावर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्तीवर आपले नाव कोरले आहे.
विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ही परीक्षा एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., रेल्वे, संरक्षण दल आणि पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, त्यातून या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
मार्गदर्शक आणि व्यवस्थापनाकडून कौतुक
या यशामागे शिक्षक अमित मडके, अविनाश सावंत, निना जगताप, रुपाली मोरे आणि प्रियांका सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी मानले.
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा आमचा मानस""दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाची कास धरून अखंडपणे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी ज्ञानाने सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आमचे शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच आज विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये येथील विद्यार्थी चमकदार कामगिरी करत असून उच्च पदांवर कार्यरत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या यशामुळे संस्थेचा शैक्षणिक नावलौकिक उंचावला आहे."— मदनराव जगताप(अध्यक्ष, गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा)
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




