जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण; राजकीय दुर्लक्षाला गावकऱ्यांचे चोख प्रत्युत्तर
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
अभेपुरी (ता. वाई) येथील ग्रामपंचायत चावडीचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार लोकवर्गणीच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. अनेक वर्षे शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याने, शेवटी गावकऱ्यांनी स्वबळावर या वास्तूचा कायापालट केला. या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे लोकार्पण सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) उत्साहात पार पडले.
अभेपुरी गाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र, गावातील सार्वजनिक कामांसाठी, विशेषतः चावडीच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रस्ताव देऊनही प्रशासकीय पातळीवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून निधी उपलब्ध झाला नाही. या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. शेवटी, पश्चिम भागातील युवा नेते अशोक (आबा) मांढरे यांनी पुढाकार घेऊन 'लोकवर्गणीतून काम' करण्याचा निर्धार केला आणि गावकऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, दीप्ती पिसाळ, जितेंद्र पिसाळ, अशोक (आबा) मांढरे, यशवंतनगर गट प्रमुख रोहित वाडकर, अभेपुरीच्या सरपंच सारिका मांढरे, आप्पा मांढरे, झुंझार मांढरे, एकनाथ गुरुजी, उपसरपंच विजय मांढरे, हंबीर मांढरे यांच्यासह गावचे ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
"जे काम शासनाला जमले नाही, ते अभेपुरीच्या एकजुटीने करून दाखवले आहे. ही वास्तू केवळ इमारत नसून गावकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे," असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.
लोकवर्गणीतून उभी राहिलेली ही दिमाखदार चावडी आज संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीय मदतीची वाट न पाहता, लोकशाहीत लोकशक्ती किती प्रभावी ठरू शकते, याचा आदर्श अभेपुरीने घालून दिला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभेपुरीतील तरुणांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




