कोकरेवाडी-विडणी परिसरात सुटकेचा नि:श्वास; एकावर हल्ला झाल्याने पसरली होती भीती
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कोकरेवाडी आणि विडणी (ता. फलटण) परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रानगव्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. तब्बल १२ तासांच्या अथक परिश्रमानंतर या रानगव्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सदर रानगवा या परिसरात शिरल्यानंतर गावात घबराट पसरली होती. या दरम्यान, रानगव्याने राजेंद्र सदाशिव जाधव यांच्यावर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक पूर्ण साधनसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हे ऑपरेशन सोपे नव्हते. रानगवा वारंवार ऊसाच्या दाट पिकात आणि शेत परिसरात लपून बसत असल्याने त्याचा माग काढणे कठीण होत होते. काल सकाळी सुरू झालेली ही मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. वनविभागाने जाळे आणि ट्रँक्विलायझर गनचा वापर करून अत्यंत कौशल्याने रानगव्याला जेरबंद केले.
या संपूर्ण मोहिमेदरम्यान ग्रामस्थांनी मोठा संयम दाखवत वनविभागाला सहकार्य केले. कोणतीही जीवितहानी न होता ही मोहीम फत्ते झाल्याने वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दरम्यान, "पकडलेल्या रानगव्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात येईल. नागरिकांनी वन्यप्राणी दिसल्यास घाबरून न जाता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता तातडीने प्रशासनाला कळवावे." असे, आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




