पिके शेतातून काढून सुरक्षित ठिकाणी ठेवली
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि लाल कांदा ही पिके काढणीच्या अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र हवामान तज्ञ पंजाब डंक यांनी दिलेल्या अचूक हवामान अंदाजामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान टळले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंजाब डंक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वेळ न दवडता आपल्या पिकांची तातडीने काढणी सुरू केली. विशेषतः गहू, हरभरा आणि लाल कांदा ही पिके शेतातून काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी पिके घरी आणून साठवणूक केली, तर काही शेतकऱ्यांनी शेतातील काढलेले पीक झाकून ठेवण्याची व्यवस्था केली.
यानंतर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता खरी ठरली; परंतु वेळेवर काढणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, जर आधीच सूचना मिळाली नसती तर गहू, हरभरा आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले असते. विशेषतः लाल कांदा आणि गव्हाचे पीक काढणीच्या अवस्थेत असल्यामुळे पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती.
पंजाब डंक यांनी दिलेल्या अचूक अंदाजामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी निर्णय घेता आला. त्यामुळे हजारो क्विंटल पिकांचे नुकसान वाचल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांचे आभार मानले आहेत.
यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे. भविष्यातही अशा प्रकारे वेळेवर सूचना मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




