वनक्षेत्राला आग लावून मोठे नुकसान
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे).
वाई तालुक्यातील चांदक व सटालेवाडी परिसरातील वनक्षेत्राला आग लावून मोठे नुकसान करणाऱ्या आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. वनविभागाच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली असून या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दि. ४ मार्च २०२५ रोजी मौजे चांदक येथील फॉ.कं. क्र. २९ आणि सटालेवाडी येथील फॉ.कं. क्र. २७ मधील सुमारे १४ हेक्टर वनक्षेत्र जळीत झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनअधिकाऱ्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर वनवा आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले.
या प्रकरणी तपास करून वनविभागाने अभिजीत तानाजी जगताप (रा. केंजळ, ता. वाई) यास ताब्यात घेतले आहे. वनपाल, वाई यांचेकडील प्र.गु.रि. क्र. ०२/२०२६ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) (ब) व (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यासाठी एक वर्षा पर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध वृक्षतोड, शिकार, वनउत्पादनांची अवैध वाहतूक, राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करणे किंवा वनवा लावणे हे गंभीर वनगुन्हे असून असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक रौंदळ तसेच वनक्षेत्रपाल, वाई महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल, वाई संग्राम मोरे व वनरक्षक सुमितकुमार चौगुले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
वनसंवर्धनासाठी वनविभागाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे वाई तालुक्यातून सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




