गावगुंडांच्या त्रासामुळे निर्मात्यांची पाठ; वाई नंतर आता माहुलीतही वसुलीचा प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा,सातारा( प्रतिनिधी शुभम कोदे )
निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा मुळे चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला आता हप्तेखोरी आणि दादागिरीचे ग्रहण लागताना दिसत आहे. क्षेत्रमाहुली येथील कृष्णामाई घाटावर चित्रीकरणासाठी आलेल्या एका निर्मात्याकडे चक्क २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक चित्रपट निर्माते हे सातारा येथील कृष्णामाई घाटावर चित्रीकरण करत असताना त्यांना फोनवरून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. चित्रीकरण सुरू ठेवण्यासाठी आरोपीने २५ हजार रुपयांची मागणी केली. धमकावण्याला घाबरून निर्मात्याने २० हजार रुपये दिले खरे, पण गुंडगिरीसमोर न झुकता त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
केवळ सातारा शहरच नव्हे, तर वाई तालुक्याची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. काही वर्षांपूर्वी हिंदी-मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेल्या वाईतून आता निर्मात्यांनी पाठ फिरवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक 'विघ्नसंतोषी' लोकांकडून होणारा त्रास.
प्रशासकीय परवाने आणि शुल्क भरूनही काही टोळ्या निर्मात्यांकडून बेकायदेशीर 'हप्ते' मागतात. हप्ते न दिल्यास काम बंद पाडण्याची धमकी दिली जाते.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने गावगुंडांचे धाडस वाढले आहे.
चित्रपट चित्रीकरणामुळे स्थानिक युवकांसाठी केटरिंग, ट्रान्सपोर्ट, लॉजिंग आणि हॉटेलिंगचे मोठे व्यवसाय उभे राहिले होते. मात्र, चित्रीकरणाचे प्रमाण घटल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. "निसर्गाने आम्हाला भरभरून दिले, पण काही गावगुंडांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे," अशी भावना स्थानिक कॉर्डिनेटर आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित निर्मात्याने कायद्याचा मार्ग स्वीकारून एक आदर्श घालून दिला आहे. मात्र, प्रशासनाने आता केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तरच वाईसह साताऱ्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सुरक्षित राहील.
दरम्यान, वाईसह साताऱ्याचे वैभव असलेल्या चित्रपट पर्यटनाला लागलेली ही 'हप्तेखोरीची कीड' पोलीस प्रशासन मुळासकट उपटून टाकणार का? की साताऱ्याची ओळख 'शूटिंग हब' ऐवजी 'खंडणी हब' म्हणून होणार? हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




