प्रभागरचना कार्यक्रम जाहीर - इच्छुकांची लगीन घाई सुरू
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान संपत आहे, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने निवडणूकपूर्व तयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा जाहीर केला आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रभागरचना कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागली आहे.
या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, इच्छुकांचे लक्ष आता आपल्या वॉर्डाच्या सीमांकनाकडे लागले आहे. प्रशासनाने प्रभागरचनेसाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून, गुगल अर्थसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी नकाशा निश्चिती गुगल अर्थचा वापर करून गावाचे नकाशे अंतिम करणे, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सीमा निश्चिती तलाठी व ग्रामसेवकांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व प्रभाग पाडणे, ११ मार्च २०२६ प्रस्ताव सादर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे, २३ मार्च २०२६ रोजी आयोग मान्यता राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक मान्यता, तर ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रसिद्धी हरकती व सूचना मागवण्यासाठी प्रारूप प्रसिद्ध करणे. असे नियोजन असणार आहे.
प्रशासनाने पारदर्शकता जपण्यासाठी नागरिकांना ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी दिली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे २१ एप्रिलपर्यंत सुनावणी होईल. जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत प्रभागरचना अंतिम करून निवडणूक आयोगाला सादर करतील. त्यानंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाईल. यामध्ये प्रभाग किती असतील आणि त्यांच्या सीमा काय असतील, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत गटविकास अधिकारी (BDO) आणि मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल. ही समिती प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. गुगल मॅप्सच्या सुपर इम्पोज पद्धतीमुळे प्रभागरचनेत अचूकता येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीचा हा पहिला टप्पा असल्याने गावोगावी आता 'फील्डिंग' लावण्यास सुरुवात झाली आहे!
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




