प्रस्तावित वैनगंगा नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा - जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन

Chief Minister Devendra Fadnavis, nagapur, shivshahi news.

नागपूर.. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अंतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प ते नळगंगा प्रकल्प पाणी वहन करताना पहिल्या टप्प्यात गरज नसतानाही ८३६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात आले आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तिथे दुष्काळी भाग असतानाही पाणी कमी देण्यात आले आहे. याकडे जल अभ्यासक आणि वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाची प्रथम मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी याबाबत फेरविचार करून दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे. 

या पत्रात डॉ. महाजन यांनी नमूद केले आहे की, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प वैनगंगा नदी ते नळगंगा प्रकल्प इथे १८०४.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वहन प्रस्तावित आहे. हे पाणी विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सिंचन घरगुती आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित आहे. या योजनेमुळे ४०४२८१ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही विदर्भासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. 

या योजनेतील पहिला टप्पा हा गोसीखुर्द ते निम्न वर्धा प्रकल्प असा असून दुसरा टप्पा निम्न वर्धा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्प असा आहे. तिसरा टप्पा हा काटेपूर्णा प्रकल्प ते बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प असा राहणार आहे.

या योजनेद्वारे दुष्काळी भागात पाणी पोहचवणे प्रस्तावित असल्यामुळे पाण्याचे योग्य वाटप होणे गरजेचे वाटते. राष्ट्रीय जल विकास अभिकरण यांनी या योजनेबाबत तांत्रिकदृष्ट्या तुटीचे क्षेत्र, वहन अंतराची लांबी, एकूण उपसा उंची याबाबत तपासणी करून अंतिमतः वैनगंगा नळगंगा ही नदीजोड योजना प्रस्तावित केली होती. या योजनेची मागणी मीच केली असल्यामुळे काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देत असल्याचे या पत्रात डॉ महाजन यांनी नमूद केले आहे. 

मूळ प्रस्तावात पहिल्या टप्प्यात ६८९ दशलक्ष घनमीटर पाणी वापर प्रस्तावित होते. ते वाढवून ८३६ दशलक्ष घनमीटर करण्यात आले दुसऱ्या टप्प्यात ६८९ दशलक्ष घनमीटर पाणी वापर प्रस्तावित होते ते आता ५८४ दशलक्ष घनमीटर करण्यात आले. तर तिसऱ्या टप्प्यात ३९३ दशलक्ष घनमीटर पाणी वापर प्रस्तावित होते. ते आता ३३६ दशलक्ष घनमीटर करण्यात आले आहे. 

यातील पहिला टप्पा म्हणजेच नागपूर, वर्धा हे क्षेत्र आहे. इथे पाणी मुबलक आहे. तर टप्पा दुसरा आणि तिसरा म्हणजेच अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात  सिंचन  सुविधा तुलनेत कमी असल्यामुळे शेती ओसाड पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी महिन्यापासूनच मैल अन मैल पायी चालावे लागते. इथे पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. अनेक गावे सिंचन सुविधा आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामुळे ओसाड पडलेली आहेत. या गावातील नागरिक त्यामुळेच मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर करीत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जास्त पाणी वापरासाठी द्यावे असे प्रस्तावित होते. त्याप्रमाणे जलविकास अभिकरणाने पाणी वापर मान्य देखील केला होता. मात्र मागील काही दिवसात आधी मंजूर असलेला पाणी वापर कमी करून पहिल्या टप्प्यात पाणी वापर वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. आज जलसंपदा विभागाकडून या भागातील जनतेला अंधारात ठेवून इथले पाणी टप्पा एक मध्ये वळवण्याचे मोठे कटकारस्थान रचण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे, असा दावा महाजनांनी या पत्रात केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील कल्पना न देता असे निर्णय झाले असावे अशी शंका व्यक्त करत आपण चौकशी करून योग्य निर्णय घेतल्यास सिंचन सुविधांचा अभाव असलेल्या आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागावर अन्याय होणार नाही याची फक्त खात्रीच नाही तर विश्वासही असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

हा प्रकल्प जेव्हा प्रस्तावित केला गेला तेव्हा पश्चिम विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील सिंचन अनुशेष आणि सिंचन सुविधांचा अभाव यासाठी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. मात्र करण्यात आलेल्या या कथित बदलामुळे दुष्काळी भाग आणि आत्महत्याग्रस्त भाग पुन्हा पाण्यासाठी वंचित राहणार आहे, याकडे डॉ. महाजन यांनी लक्ष वेधले आहे.

आतापर्यंतच्या अनेक कागदपत्रांवरून आपल्या लक्षात येईल की या प्रकल्पासाठी खूपच घाई करण्यात येत आहे आणि या प्रकल्पात रोज नवनवीन कागदपत्रांचा खेळ खेळला जात आहे. तिथे अनेक बाबी महत्त्वाच्या असून भविष्यात जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रातून केंद्रीय जल आयोगाकडे जाईल, त्यावेळी या आकड्यांच्या खेळावर बोट ठेवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. आणि असे होऊ नये यासाठी नियम बाबी, नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्या अशी सूचनाही केली आहे. 

त्यामुळेच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा प्रकल्प आपल्या मार्गदर्शनात पुढे जावा अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !