वाई ते एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दुरावस्था
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची ठेकेदाराचा गलथान कारभार आणि बेजबाबदारपणामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन पडलेल्या फुट ते दिड खोलीच्या खड्ड्या मुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून आपल्या दुचाकी चालवाव्या लागत आहेत. या बाबत रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी अनेकवेळा लेखी तक्रारी करून देखील संबधीत ठेकेदार आणि विभागाकडून याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि शेकडो कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकतर दिवसभर कंपनीत मरणाचे काम करुन संध्याकाळी घराकडे जातांना मोठी कसरत तर करावी लागतेच पण दुचाकी वाहने अक्षरशः खिळखिळी झाल्याने त्यांच्या दुरुस्ती साठी नाहक आर्थिक फटका बसत आहे.
वाई तालुक्यातील मांढरदेव गडावर आई काळुबाईचे मंदीर आहे. हे दैवत महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने आईच्या दर्शनासाठी शेकडो भाविक भक्तांसह पर्यटक देखील या रस्त्याने आईच्या दरबारात जातात .वाईची एमआयडीसी ही फार मोठी असुन या एमआयडीसीत वाई खंडाळा महाबळेश्वर कोरेगाव मेढा तालुक्यातील हजारो महिला पुरुष त्यांच्या हातांना काम मिळते म्हणून येत असतात तेही याच रस्त्याने ये जा करत असतात.
तसेच एमआयडीसी, सुलतानपूर, बोपर्डी, गुंडेवाडी, धावडी आदी गावांतील ग्रामस्थ व विद्यार्थी देखील शिक्षणासाठी वाई सातारा खंडाळा पाचगणी शिरवळ या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करीत असतात. वाईच्या उत्तरेकडील बराचसा भाग या रस्त्याने वाईला जोडलेला आहे. मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रामुख्याने वाई रविवार पेठ ते एमआयडीसी हा सुमारे दोन तीन किलोमीटर लांबीचा रस्ता अक्षरशा उखडून टाकल्या सारखा झाला आहे. या रस्त्यावरून एमआयडीसीत जाणारे कामगार यामुळे हैराण झाले असून रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पावसाळ्या पूर्वी हा रस्ता होणे गरजेचे होते परंतु ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाने या रस्त्याची डागडुजी ही केली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची किमान दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिक व कामगारांनी दिला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा