दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी केला २ लाख ८० हजाराचा ऐवजी लंपास
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
मंगळवेढा शहरात दोन घरांची कुलपे तोडून दागिने व रोख रकमेसह २ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर सोलापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळल्याचे सांगण्यात आले.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी इकबाल मुलाणी हे फळ व्यापारी असून, ७ जून रोजी रात्री १०.३० वाजता कुटुंबातील सारे जण जेवण करून झोपी गेले. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास इकबाल यांचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना घराचा व बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला. पुढे जाऊन पाहिले असता कपाटही उघडे दिसले.
बहीण यास्मीन हिने फळविक्री व्यवसायातून मिळविलेले ६० हजार रुपये, सोन्याचे नेकलेस असा १ लाखांचा मुद्देमाल कपाटात ठेवला होता तो चोरट्यांनी लांबवला. त्याचबरोबर पांडुरंग वेताळ नागणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ५० हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नागणे यांच्या कुटुंबायात कुटुंबकर्त्याचे निधन झाल्यामुळे ते घराला कुलूप लावून दुसरीकडे रहावयास गेले होते. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत चोरी केली. या दोन्ही चोरीच्या घटनांनंतर शहरवासीय धास्तावले आहेत. मुलाणी कुटूंबियाने बकरी ईद झाल्यानंतर हज यात्रेला जाण्यासाठी कपाटात ६० हजार रुपये ठेवले होते. चक्क चोरट्याने त्या पैशावर डल्ला मारल्याने मुलाणी कुटूंबाच्या दर्शनाचे स्वप्न हे अधुरेच राहिले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा