आमदार समाधान आवताडे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडल्यामुळे व परतीच्या पावसाने हाहाकार केल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर पडणार असून ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांच्या लागवडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेल्या शेती नुकसानांची पाहणी करून बाधित व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करावेत असे आदेश पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दोन्ही तालुक्यातील तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये सलग पावसाने झोडपून काढले आहे. परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतातील ताली भरल्या आहेत, तसेच शेतातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सातत्याने पडणाऱ्या पाऊसामुळे मतदारसंघातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेली पिके पाऊसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीपातील काढून पडलेली बाजरी, मका, उडीद, मूग अशा पिकांच्या रासणीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अशा नानाविध संकटाच्या मालिकेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या अनुषंगाने संबंधित शासकीय यंत्रणानी आवश्यक पाऊले उचलून पंचनामे करावेत असेही आमदार आवताडे यांनी आदेशीत केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा