आढावा व विचारविनिमय बैठकीत आमदार समाधान आवताडेंनी मांडले प्रश्न
शिवशाही वृत्तसेवा पुणे
देशातील लाखो वारकरी भाविकांचे दैवत असणाऱ्या श्रीगुरु पांडुरंगाच्या दर्शनासाठी अलंकापुरीत दाखल होणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यासाठी शहरातील मूलभूत सोयी - सुविधा अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे आढावा व विचारविनिमय बैठक पार पडली.
वारकरी भाविकांची मांदियाळी असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरीची ओढ लागलेली असते. हरीभक्तीच्या छंदात दंग होऊन विठुनामाचा जयघोष करत लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. भक्ती साधनेचे माहेरघर असणाऱ्या पंढरपूर शहरातील विविध समस्या अथवा प्रश्न शासनसहाय्य माध्यमातून आषाढी वारीपूर्वीच सुटावेत यासाठी आ. समाधान आवताडे हे अनेक दिवसांपासून आग्रही आहेत. आ. आवताडे यांनी भाविकांच्या आरोग्य दृष्टीने औषध - गोळ्या यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे, स्वच्छतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शौचालय यांचे प्रमाण वाढविणे, येणाऱ्या वारकरी भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणी शुद्धीकरण प्लांटमध्ये वाढ करणे गरजेचे आहे कारण वारी मद्ये पाण्याचा टँकर आत मध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे भाविकांचे पाण्यासाठी हाल होतात त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत आदी प्रश्नांवर उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासमवेत पुणे येथे झालेल्या बैठकीत आ. अवताडे यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले होते.सदरील मीटिंग मध्ये मा. उपमुख्यमंत्री यांनी विभागीय आयुक्त यांना आ. आवताडे यांच्या मांडलेल्या प्रश्नावर आपण स्वतः जाऊन सर्व विभागाची मीटिंग घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते त्या संलग्न आज आयुक्त यांनी बैठक घेऊन सदरील गोष्टीचा विभागा नुसार आढावा घेतला.
आ. समाधान आवताडे यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावतात याचा पाढा वाचला होता.आषाढी वारी झाल्यानंतर पंढरपूर शहर व आसपास कच्या गावांना दुर्गंधीचा फार त्रास होत असतो या कारणाने शहरातील बहुतांश जेष्ठ नागरिक बाहेर गावी जाऊन राहतात सदरील नागरिक दुर्गंधी त्रस्त होऊन जात असल्याने व त्यांचा आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने विविध उपयोजना होणे गरजेचे आहे. आ. आवताडे यांनी मांडलेल्या विकासाभिमुख मतांचा व केलेल्या सदर मागण्यांच्या संदर्भात आढावा घेणारी ही बैठक पार पडली.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक हिंम्मतराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब संमिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड.विश्वास ढगे, सोपान महाराज पालखी सोहळा प्रमख त्रिगुणगोसावी आदी मान्यवर, यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी, मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा